मंदिरे उघडण्याबाबत आकस का?

Foto
मनसे प्रमुख राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संतप्त सवाल
सध्या महाविकास आघाडी सरकारचे काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारे आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये ? अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यासंबंधी विचारणा केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमधील निर्बंध राज्य सरकारकडून शिथील करण्यात येत आहे. 2 सप्टेंबरपासून अनलॉकच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. मात्र मंदिरे खुली करण्यासंबंधी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
अनलॉक क्रमांक अमुक तमुक अशा अनलॉक प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली जात आहे. आणि या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरुच आहे, असे का ? या सरकारला मंदिरे उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.
करोनामुळे जेव्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते तेव्हा मंदिरं बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्हीदेखील समर्थन केले होते. पण आज जेव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना नेमकी महाराष्ट्रात देवळं का बंद ठेवली जात आहेत? जर मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथील करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते तर तशीच गोष्ट मंदिर प्रवेशासाठी देखील असू द्या, असं राज ठाकरेंनी म्हटले आहे.
पुढे त्यांनी लिहिले आहे की, लॉकडाउनच्या काळात आषाढीची वारी असो, गोपळकाल्याचा उत्सव असो की गणेशोत्सव असो, राज्यातील हिंदू बांधवांनी कमालीचे सामंजस्य दाखवले आहे. सरकारच्या आदेशाचे अत्यंत समजूतदारपणे पालन केले आहे. उद्या मंदिर उघडली तर या राज्यातील माझा हिंदू बांधव आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळेल याची मला खात्री आहे, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.  मंदिरे सुरु करणे म्हणजे निव्वळ काही भक्तांच्या पुरता हा विषय मर्यादित नाही. इथे त्यात देवाची सेवा करणारे पुजारी असोत, गुरव असोत की त्या मंदिरावर अवलंबून असणारी एक छोटीशी अर्थव्यवस्था असो यांचा सरकार विचार करणार आहे की नाही? एका मंदिरावर त्या गावाची, त्या शहराची अर्थव्यवस्था अवलंबून असते. ती अर्थव्यवस्थाच जर कोलमडणार असेल तर त्यांना साकडे घालायचे कोणाकडे?, अशी विचारणा राज ठाकरेंनी केली आहे. सरकार स्वत:च्या धुंदीत तल्लीन झाले आहे त्यामुळे देवा या अस्मानी, सुलतानी संकटातून सोडव असे साकडे त्यांना देवाकडे घालायचं आहे आणि म्हणून सरकारने देव आणि त्याचे भक्त यांची ताटातूट करण्याच्या फंदात पडू नये, असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. सरकारने मंदिरं सगळ्यात शेवटी उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये. त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. पण तरीही सरकारने जर लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचलले नाही, तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारुन मंदिरात प्रवेश करावा लागेल. पण मी आशा करतो की सरकार ही वेळ आमच्यावर येऊ देणार नाही, असे राज ठाकरेंनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker